राष्ट्रीय कृषी बाजार योजना (eNAM) मध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश
केंद्र सरकारने बाजार समित्यांमध्ये शेतमाल खरेदी विक्री अमूलाग्र सुधारणा करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात नव्याने 55 बाजार समित्यांचा समावेश करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश करण्यात आला आहे
ई-नाम योजनेतून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल देशात कोठेही विक्री करता येत आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात देशातील सुमारे 600 बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला होता. यात महाराष्ट्रातील 30 बाजार समित्यांचा समावेश करून त्यांना प्रत्येकी 30 लाखांचा निधी देण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात 30 व तिसऱ्या टप्प्यात 55 अशा एकूण 115 बाजार समित्यांचा समावेश ई-नाममध्ये करण्यात आला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ई-नाम योजनेच्या अंमलबजावणीत बारामती बाजार समितीची तिसऱ्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत बारामती बाजारात संगणकीय कृत लिलाव पद्धतीची 2016 पासून अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना माल बाजारात आल्यानंतर त्याची इनगेट इंट्री होताच त्या शेतकऱ्यांना एसएमएस पाठविला जातो.
त्यानंतर शेतमाल आणि अडत्याकडे गेल्यावर मालाचे वर्गवारीनुसार गट पाडून ई-लिलाव केला जातो. या प्रणालीमुळे खरेदीदाराला बाजार आवारात येऊन शेतमाल खरेदी करावा लागत नाही. ज्याची बोली अधिक त्याच्याशी विक्री करार करून शेतकरी, आडते, हमाल व मापाडी त्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम ऑनलाइन जमा केली जाते.