...जेव्हा पहाटे साडेपाचलाच अजितदादांचे काम सुरु होते!
बारामती : ...वेळ सकाळी साडेपाचची...स्थळ...बारामतीतील तीन हत्ती चौक....पहाटेची वेळ असल्याने रस्ता निर्मनुष्य असतो, तेवढ्यात तेथे काही गाड्या वेगाने येतात....आणि सुरु होते या चौकाच्या सुशोभिकरणाची चर्चा.....इतक्या पहाटे या चौकात येऊन अशा विषयावर चर्चा करणारे नेते कोण असतील हे वेगळे सांगण्याची गरज नसते, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटे येथे येऊन या बाबत पाहणी करत असतात.
दिवसातील प्रत्येक मिनिटाचा वापर विकासकामांसाठीच व्हायला हवा, असा अट्टाहास अजित पवार यांचा असतो. वेळेचा अत्यंत कुशलतेने वापर कसा करायचा हे अगदी आयएएस आणि आयपीएस अधिका-यांनीही त्यांच्याकडून शिकावे, असेच त्यांचे 'टाईम मॅनेजमेंट'....सकाळी लवकर पुण्याकडे जायचे असल्याने साडेपाचलाच त्यांनी अधिकारी व पदाधिका-यांना तीन हत्ती चौकात उपस्थित राहायला सांगितलेले असते.
ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्यासह नगरसेवक सुधीर पानसरे, बिरजू मांढरे, अभिजित जाधव तसेच अभिजित चव्हाण हे पदाधिकारी तर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वास ओहोळ, तहसिलदार विजय पाटील हेही उपस्थित असतात. शहरातील नीरा डावा कालवा सुशोभिकरणाच्या कामातील महत्वाचा टप्पा आहे तो तीन हत्ती चौकाच्या सुशोभिकरणाचा.
आज प्रत्यक्ष जागेवर उभे राहून स्वताः अजित पवार यांनी प्रत्येक गोष्टीची माहिती घेतल्याचे किरण गुजर यांनी नमूद केले. प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती घेत काही सूचना करत त्यांनी हे काम वेगाने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
अजित पवारांचा कामाचा झपाटा प्रचंड असल्याने त्यांच्यासोबत दौरे करताना आणि त्यांच्या सूचना लिहून घेताना अधिका-यांची पार दमछाक होते. त्यांच्या बारीक सारीक गोष्टीही लक्षात राहत असल्याने व सूचनांवर कार्यवाही झाली नाही, तर पवार यांची नाराजी स्विकारावी लागेल या भीतीने अधिकारीही पळत असल्याचे चित्र बारामतीत दिसत आहे. पहाटे साडेपाचलाच आज विकासकामांची चर्चा असल्याने अधिकारीही आवरुन पहाटे पाचलाच तीन हत्ती चौकात हजर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.