
बारामती : शेतकऱ्यांची वीज तोडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांचा ऊर्जा उर्जा भवन समोर ठिय्या
बारामती तालुक्यातील डोरलेवाडी व झारगडवाडी येथील जवळपास ६० विद्युत रोहित्रांचा वीज पुरवठा तोडल्याने या दोन्ही गावातील ७५० वीजजोड मागील दहा दिवसांपासून बंद केल्याने येथील येथील शेतकऱ्यांनी आज बारामती शहरातील भिगवण रोडवरील ऊर्जा भवन येथे प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून विजजोड पूर्ववत जोडण्याची मागणी केली आहे.
डोरलेवाडी व झारगडवाडी येथील सर्व विद्युत रोहित्र वीजबिल थकल्याने महावितरणने बंद केल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेतीतील फळबागांचे,नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच वीज ग्राहकांना हस्तलिखित वीजबिल दिली जातात, तसेच त्याची नोंद ठेवली जात नाही. दोन्ही गावातील डीपी बंद केल्याने येथील वीजबिल भरलेल्या वीज ग्राहकांची देखील वीज तोडली आहे. तर मिटरवरील रिडींग न घेता जास्तीचे वीजबिल दिले जाते. कोरोना संसर्गाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीपंपाचे वीज बिल भरण्याची परिस्थिती नाही. त्यात वीज तोडल्याने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी महावितरणवर राहील.
भरमसाठ वाढीव व बोगस बिले शेतकऱ्यांना आली आहेत.तरी प्रत्येकाला नियमानुसार वीजबिले मिळावीत. तसेच दोन्ही गावच्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडित केला. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निषेध नोंदवत आहे. तरी शेतकऱ्यांशी त्यांची वर्तणूक योग्य नाही. दखल न घेतल्यास सर्व शेतकरी येणाऱ्या दोन दिवसात उपोषणास बसणार आहेत, असे जमलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी सांगितले.